• September 17, 2026
  • टीम मनोगत भाजपा
  • 0

छत्रपती संभाजीनगरदि. 17 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला, आता दुष्काळाशी संघर्ष सुरू आहे. यंदाही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीतही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कोकणातील आणि कृष्णा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहोत.

मुक्तिसंग्रामातील योद्ध्यांचे स्मरण

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानींप्रती कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेकांच्या बलिदानामुळे मराठवाडा मुक्त झाला आहे. त्यावेळी भारताचे लोहपुरुष आणि पहिले उपपंतप्रधान, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक प्रचंड मोठी लढाई उभारली आणि त्यातून आपला मराठवाडा मुक्त झाला. त्यावेळी अत्याचाराची परिसीमा झाली होती. अशा प्रकारच्या अवस्थेतून या मराठवाड्याला बाहेर काढण्याचे काम आपल्या स्वातंत्र्यसेनानींनी केले.

शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्यासाठी यंदाचे वर्षदेखील दुष्काळाचे वर्ष आहे. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती-पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आमचा शेतकरीही चिंतेत आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत आपण देऊ. पंचनाम्यांची प्रक्रिया 5 ऑक्टोबरनंतर पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. पिण्याचे पाणी, चारा अशी सर्व व्यवस्था आणि नियोजन केले आहे.

कर्जमुक्तीचा लाभ, जुनी वीजबिले रद्द

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ सुरू केली. या योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. आतापर्यंत 15,00,000 हून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. आपल्या सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे, शिवाय आता जवळपास ₹48,000 कोटींची जुनी वीजबिले रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू न देण्याचा संकल्प

मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला; पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही, हा संकल्प आम्ही केला आहे. त्या दृष्टीने अतिशय वेगाने वाटचाल सुरू आहे. कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त 30 टीएमसी पाणी भीमा खोऱ्यातून मराठवाड्यात आणण्याचे काम आता सुरू करत आहोत. यामुळे धाराशिव, बीड आणि लातूरपर्यंत पाणी आणता येईल.

उल्हास खोरे आणि कोकणातून पाणी उचलून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जवळपास 70 टीएमसी पाणी उल्हास खोऱ्यातून हे गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. टप्प्याटप्प्याने 7 वर्षांत हे काम पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

प्रत्येक घरी दररोज पाणी

शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. निधी कमी पडू दिला जाणार नाही, वेगाने काम सुरू आहे. तसेच अडचणी आपण दूर करत आहोत. लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरी दररोज पिण्याचे पाणी येईल. त्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली आहे.

देशातील मोठी उद्योग वसाहत

छत्रपती संभाजीनगरमध्ये पश्चिम उन्नत द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गामुळे शेंद्रा-बिडकीनसारख्या औद्योगिक वसाहती तसेच डीएमआयसीसारखे क्लस्टर आता देशातील प्रमुख क्लस्टर झाले आहेत. या ठिकाणी टोयोटा, जेएसडब्ल्यू, एथर यांसारख्या कंपन्यांमुळे पुढील काळात देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक व्हेईकल्स मॅन्युफॅक्चरिंग करणारे क्लस्टर म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या क्लस्टरला ओळख मिळेल आणि एक वेगळा सन्मान प्राप्त होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

उद्योग क्षेत्राचा विस्तार

उद्योग विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मराठवाड्यात येत आहे आणि या गुंतवणुकीला अनुरूप आता आपण इन्फ्रास्ट्रक्चरदेखील तयार करत आहोत. अजून 8000 एकर जागा त्या ठिकाणी अधिग्रहित करून आपली औद्योगिक वसाहत आपण मोठी करत आहोत. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे आपल्याकडे रोजगाराची निर्मिती होत आहे आणि या रोजगारातून समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न मराठवाड्यात होत आहे.

सक्षम आणि जलद दळणवळण

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्योगाच्या परिसंस्था विकासासाठी उपाययोजना सुरू असून, जालना ड्रायपोर्टचे काम आता सुरू झाले आहे. आपल्याकडे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या आवश्यक आयात-निर्यातीची सुविधा या ड्रायपोर्टवरून करण्यात आली आहे. तसेच, संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातही आपल्याला चांगला वाव आहे. त्यासाठी आपण शेंद्रा-बिडकीन आणि बिडकीन-ढोरेगाव हे दोन रस्ते सहापदरी करत आहोत. त्यासाठी ₹3500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील सगळ्यात लांब उन्नत रस्ता आपण तयार करत आहोत. त्यामुळे कुठलाही ट्रॅफिक जॅम पुढच्या काळामध्ये होणार नाही.

आरोग्य सुविधांचा विकास

आरोग्य सुविधांच्या विकासाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ₹710 कोटींच्या नवीन इमारतीची उभारणी, धाराशिवमध्ये 500 खाटांचे अद्ययावत रुग्णालय व मेडिकल कॉलेज, तसेच परळीमध्ये ₹565 कोटी खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक सुविधांच्या विकासाचे काम आपण सुरू केले आहे.

सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तन

मराठवाडा हा आकांक्षी प्रदेश आहे. अनेक अडचणींचा सामना करणारा प्रदेश आहे. सगळ्यांना सोबत घेऊन मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर आणण्याचे आणि परिवर्तित करण्याचे कार्य आपण सुरू केले आहे. समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सुविधा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार प्रशांत बंब, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा