मुंबई, दि. 8 : संजय राऊत, तुमचे मालक उद्धव ठाकरे ना खासदारांना भेटत ना आमदारांना. कार्यकर्त्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद असतातच, पण आपल्या खासदारांसाठीही ते तुम्ही बंद ठेवता. त्यामुळेच तुमचे खासदार तुमची साथ सोडून जात असल्याने तुमच्या पक्षाची वाताहात झाली आहे. देशातील 140 कोटी जनतेचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सर्वच पक्षाच्या खासदारांना वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा करतात. त्याचप्रमाणे काल त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधल्याने संजय राऊत यांचा तिळपापड होण्याचे काय कारण, असा असा करडा सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कुणाला जिलेबी, फाफडा आणि ढोकळा भरवत होते, हे पाहण्यासाठी संजय राऊत तिथे लपून बसले होते का, असा सवाल करत श्री. बन म्हणाले, संजय राऊत, तुम्ही मातोश्रीत कुणाला तेलकट वडे देत होता ते राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगितले आहेच. आता तुम्ही तुमच्या खासदार, आमदारांना मातोश्रीवरचे तेलकट वडेही देत नाहीत. जिलेबी, फाफडा, ढोकळा हा गोंधळ करण्यापेक्षा मातोश्रीवरच्या तेलकट वड्यांचा इतिहास आठवा. काँग्रेससोबत राहून सेटिंग करायचे, एवढेच तुम्हाला जमतेय. राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा, तर न्यायालयात निकाल लागायचा तो लागेल. परंतु जनता वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या आणि एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनतेने खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले आहे.
 
 
नारीशक्ती विधेयक मंजूर होणार नाही, असा दावा संजय राऊत करतात. नारीशक्ती विधेयकाला विरोध करत तुम्ही महिलांचा अपमान करत आहात. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींचा, महिलांचा अपमान केल्यानंतर ममतादीदींची काय अवस्था झाली, हे देशाने पाहिलेय. तुम्ही महिला आरक्षण विधेयकाला विरोध करत असल्याने या देशातील माता-भगिनी तुम्हाला माफ करणार नाहीत. 2029 च्या लोकसभा निवडणुकीत त्या तुम्हाला चांगलाच धडा शिकवतील. तुम्हाला भीती आहे की, उद्या रणरागिणी महिला सभागृहात आल्या तर आपली पळता भुई थोडी होईल. तुम्ही कशा पद्धतीने महिलांना शिवीगाळ करता हे महाराष्ट्राने तुमच्या तोंडातून ऐकलेले असल्याने नारी सन्मान, नैतिकता या मुद्द्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे श्री. बन यांनी सुनावले.
 
 
 
संजय राऊत, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने तुमचा लंगोट खेचून तुम्हाला नागडे केले आहे. त्यामुळे अमितभाई शाह यांच्यावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेने आपले वस्त्रहरण का केले, याचे आत्मपरीक्षण करा. कुंभमेळ्याची कंत्राटे मराठी माणसालाही मिळतात. राज ठाकरे यांना मराठी कंत्राटदारांची नावे पाठवून देतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलेय. संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांनाही आम्ही मराठी कंत्राटदारांची नावे पाठवून देऊ. परंतु 25 वर्षे मुंबई महापालिका लुटत असताना असताना तुम्ही किती मराठी कंत्राटदारांना संधी दिली होती याची यादी एकदा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सादर करावी, असे आव्हानही श्री. बन यांनी दिले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा