मुंबई, दि. 1 : जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील माफियागिरी संपवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तुम्ही रेशन, खिचडीत करोडोंचे घोटाळे केले, भू-माफियागिरी केली. तुमच्यासारख्या माफियांचा कर्दनकाळ होत महाराष्ट्र माफियामुक्त करण्याचे काम देवाभाऊंनी केलेय. तुमच्यासारख्या भूखंड खाणाऱ्यांचे, पत्राचाळ गिळणाऱ्यांचे आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर काढणाऱ्यांचे ते कर्दनकाळ आहेत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत, तुमचा भोंगा सनईसारखा नाही, तुम्ही राहुल गांधींचा पोंगा वाजवण्याचे काम करताय. तुमचा भांडाफोड करत तुमच्या भोंग्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम देवाभाऊंनी काल केले. तुमचे सर्व फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करून टाकले आणि तुमच्या नॅरेटिव्हची पूर्णपणे चिरफाड केल्याने तुमच्या भोंग्याची हवा निघून गेली आहे, असे श्री. बन यांनी सुनावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत श्री. बन म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले होते, अभिजीत दीपके विष्णूचा अवतार आहे. अभिजीत दीपकेची पूजा तुम्ही मातोश्रीच्या देव्हाऱ्यामध्ये करताय. त्याबद्दल संजय राऊत यांनी आधी बोलले पाहिजे आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांनी त्याचे उत्तर दिले पाहिजे.
अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा फोटो हटवला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची तुलना करण्यात आली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला वंदनीय आहेत. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. मोदीजींचा फोटो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो यात अंतर आहे. तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांवर खरेच प्रेम असेल, तर माझे अमित ठाकरे, संजय राऊतांनाही आव्हान आहे. दादरमध्ये उबाठा गटाच्या भवनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर कुणाचा फोटो लावला आहे? या उबाठा गटाच्या भवनासमोर जाऊन तुम्ही आंदोलन करणार आहात का? माझे दुसरे आव्हान आहे, मालेगावच्या महापालिकेत लावलेला टिपू सुलतानचा फोटो हटवण्यासाठी तुम्ही का आंदोलन केले नाही, असा सवाल श्री. बन यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी राज ठाकरे यांनी कशा पद्धतीने मतदार यादीत दुबार नावे घुसवली जातात याचे प्रेझेंटेशन दिले होते. हिंदू मतदारांवर आक्षेप घेण्याचे काम त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केले होते. आता संजय राऊत म्हणताहेत की काही धर्माच्या लोकांना तुम्ही वगळले. काही धर्माच्या म्हणजे कोणाच्या? ज्या अफजलखानाच्या वंशावळी आहेत, ज्या बांगलादेशी रोहिंग्यांची मते मुंबईत आहेत, अशांना दूर करायचे नाही? तुमच्या सोयीसाठी आणि दाढ्या कुरवाळण्यासाठी तुम्ही मुंबईच्या अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्यांची मते मतदार यादीत घुसवली होती. एसआयआरच्या माध्यमातून त्याला चाप बसला असेल तर संजय राऊत त्याला विरोध का करतात?, अशी विचारणा श्री. बन यांनी केली.













































































