भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा गौप्यस्फोट
मुंबई, दि. 26 : जनाब संजय राऊत यांनी काल राहुल गांधी यांची घेतलेली भेट ही येत्या दोन वर्षांत उबाठा गट पूर्णपणे संपवून काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी घेतलेल्या दहा हजार कोटी रुपयांच्या सुपारीतील एक हजार कोटी रुपये कमिशनचा पहिला हप्ता कोणत्या मार्गाने वळता करायचा याची सविस्तर चर्चा करण्यासाठी होती, असा गौप्यस्फोट भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ही सुपारी घेतल्याने येत्या काळात मी फक्त तुमचेच कौतुक करणार. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल चकार शब्दानेही बोलणार नाही, अशी हमीही संजय राऊत यांनी राहुल गांधींना दिल्याची खात्रीलायक माहिती असल्याचा दावा करत श्री. बन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे नेते आहेत, तर राहुल गांधी इंडिया आघाडीचेही नेते नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 2014 ते 2024 या काळात आम्ही सातत्याने तीन निवडणुका जिंकल्या आहेत. राहुल गांधींना 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये जितके खासदार जिंकता आले नाहीत, त्यापेक्षा जास्त खासदार मोदीजींनी 2024 मध्ये जिंकले. महाराष्ट्रातल्या जनतेने तुमची लक्तरे काढली. काँग्रेसची लक्तरे तर वेशीला टांगलेली आहेत, ते आधी पहा.
श्री. बन पुढे म्हणाले, उत्तम प्रकृती असलेले देशभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आजही 18 -18 तास काम करत आहेत. तुम्हाला आणि उद्धव ठाकरेंना शंभर वर्षे आयुष्य मिळो, कारण तुम्हाला उबाठा गटाची वाताहत झालेली बघायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनाही 100 वर्षे आयुष्य मिळणार आहे, कारण मोदीजींना विकसित भारत बघायचा आहे तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना उबाठा गटाची वाताहत बघायची आहे. हा फरक आमच्यात आणि तुमच्यामध्ये आहे.
संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी राहुल गांधींची झोप उडवली आहे. उद्धव ठाकरे यांना तर झोपच येत नाही. आदित्य ठाकरे आणि तुमचीही झोप पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि एनडीएने उडवली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींची झोप उडवली, त्यानंतर यूपीमध्ये समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची झोप उडाली. त्यामुळे आधी आपल्या झोपेची चिंता करा. 2029 लाही राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत हे लक्षात आल्याने तुमची झोप उडाली आहे, असे श्री. बन यांनी सुनावले.
काँग्रेसचे सरकार असताना काश्मीरच्या लाल चौकात हिरवा झेंडा फडकत होता. या 15 ऑगस्टला तिथे तिरंगा फडकला. काश्मीर असुरक्षित आहे, असे म्हणणारे संजय राऊत फेब्रुवारीमध्ये स्वतः काश्मीरमध्ये जाऊन आले आणि ‘काश्मीरचे नंदनवन’ असे ट्विटही केले होते. तुम्ही काश्मीरमध्ये जाऊ शकलात कारण अमितभाई शाह यांनी 370 कलम हटवले. आज शेकडो पर्यटक काश्मीरमध्ये जात आहेत आणि कुठेही दगडफेक होत नाही. काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये रोज दगडफेक होत होती, तिथे आज दगडफेक होत नाही. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झाले आणि तुम्ही मात्र पुरावे मागत राहता, असा शब्दात श्री. बन यांनी फटकारले.













































































