भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर प्रहार

मुंबई, दि. 24 : एका बाजूला महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला संसदेत महिला आरक्षण मंजूर होऊ द्यायचे नाही जनाब संजय राऊत यांचा दुटप्पीपणा आहे. 2023 ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले होते, तेव्हा तुम्ही संसदेत, राज्यसभेत गांजा ओढत बसला होता का? 2029 ला महिला आरक्षण लागू करायचे असेल, महिलांचा सन्मान करायचा असेल, संसदेत महिला खासदार येऊ द्यायच्या असतील तर तुम्हाला हे विधेयक मंजूर करावे लागेल. अन्यथा तुम्ही नाटकी, ढोंगीबाज आणि महिलाविरोधी आहात हे पुन्हा एकदा उघड होईल, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

2023 ला संसदेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकात 2023 नंतर जनगणना होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक लागू होणार नाही, अशी अट होती. त्यानुसार 2034 पर्यंत महिला आरक्षण विधेयक लागू करता येणार नसल्याने त्या विधेयकात सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारने 2026 ला पुन्हा विधेयक संसदेत मांडले, तर त्याला काँग्रेस, उबाठा ने विरोध केला. संजय राऊत, तुम्ही 2023 मध्येही महिला आरक्षणाच्या विरोधात होता. परंतु एनडीएकडे पूर्ण बहुमत असल्याने नाईलाजाने त्यावेळेला तुम्ही महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिले. आता 2026 ला आणलेल्या या विधेयकात 2011 ची जनगणना गृहीत धरून महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन लागू करावे, अशी सुधारणा केली गेली. म्हणजे 2029 च्या निवडणुकीत महिला आरक्षण विधेयक लागू करता येईल. परंतु संजय राऊत आणि राहुल गांधी नाटकीपणा करताहेत, असे श्री. बन यांनी सुनावले.

संजय राऊत, दंतकथा काय असतात आणि तुमच्या जंतकथा काय आहेत, हे महाराष्ट्र बघतोय. तुमची पोटदुखी होते, कारण तुमच्या पोटात जंत झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चहा विकला की नाही, हे जनतेला माहिती आहे. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान होतो. तुम्ही दावा केला होता की, मी दाऊदला घाबरत नव्हतो, त्याची कॉलर पकडली होती. संजय राऊतांनी दाऊदची कॉलर पकडलेला एक फोटो महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवावा, अशी खिल्ली श्री. बन यांनी ओढली.

सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांना संधी देणारा एकमेव पक्ष भारतीय जनता पार्टी असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, राहुल गांधी कुठल्या सर्वसामान्य घरातून आलेत? उद्धव ठाकरे कुठल्या सर्वसामान्य घरातून आले? आदित्य ठाकरे कुठल्या सर्वसामान्य घरातून आलेत? याचे उत्तर संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे. भाजपात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस, अमित शाह, योगी आदित्यनाथ अशी शेकडो नेत्यांची नावे घेता येतील ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेत आणि या देशाचे नेतृत्व करत आहेत.

 

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा