अमरावती, दि. 19 : तिवसा परिसरात पावसाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाअभावी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोबत तिवसा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली.
तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या नुकसानीची स्थिती, त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने व वस्तुनिष्ठ पंचनामे आणि सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर व सोलर पंपांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई-पिक पाहणीची नोंद पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आ. प्रविण पोटे पाटील, आ. प्रताप अडसड, आ.राजेश वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, तिवसा शहर अध्यक्ष अजय गुल्हाने, छाया दंडाळे, प्रदीप गौरखेडे तसेच शेतकरी उपस्थित होते.
दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी बांधवांना त्वरित मदत व योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी महायुती शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.















































































